मुंबई - विधिमंडळात 2016-17 चा अर्थसंकल्प सादर करताना चंद्रभागेच्या पावित्र्याचे व निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन "नमामि चंद्रभागा‘ मोहीम राबवून 2022 पर्यंत चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र व प्रदूषणमुक्त करून तिचे संवर्धन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता. यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर
केला आहे. पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखणे व ही नदी प्रदूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या "नमामि गंगे‘ या अभियानाच्या धर्तीवर "नमामि चंद्रभागा‘ ही मोहीम राबविण्याचा संकल्प सरकारने जाहीर केला होता. "नमामि चंद्रभागा‘ ही मोहीम जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असून, चंद्रभागा नदी व त्यासाठी वसलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कायम राहावी, यासाठी बंधारे बांधणे, नदीचा किमान पर्यावरणीय प्रवाह अबाधित ठेवणे, पंढरपूर यात्रेच्या दरम्यान आळंदी, देहू यांसारख्या वारकऱ्यांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्नानगृहे व शौचालये उपलब्ध करून देणे, पंढरपूर वारीच्या मार्गिकेवरील मुक्कामांच्या ठिकाणावर पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे, स्नानगृहे, निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा कायमस्वरूपी तयार करणे, पंढरपूर शहराची लोकसंख्या; तसेच येणाऱ्या यात्रेकरूंची लोकसंख्या विचारात घेऊन पुरेशा प्रमाणात फिरती जैविक पद्धतीची शौचालये उपलब्ध करून देणे, चंद्रभागा नदीच्या वरील भागातील भीमा नदीच्या उपनद्यांवरील नागरी वस्त्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे व नागरी घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आदी कामांचा या मोहिमेत प्रामुख्याने समावेश आहे.
या मोहिमेसंदर्भात चंद्रभागा नदीसंवर्धन व संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून, त्यास "नमामि चंद्रभागे प्राधिकरण‘ असे संबोधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाचे सहअध्यक्ष अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे.
No comments:
Post a Comment