खासगी क्षेत्रात महाकाय आयुर्विमा कंपनीची वाट सुकर खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने शुक्रवारी मॅक्स लाइफ या दुसऱ्या खासगी विमा कंपनीला आणि तिची प्रवर्तक असलेल्या मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेसला विलीन करून घेण्याबाबत अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले. भारतीय आयुर्विमा उद्योगातील आजवरचा हा सर्वात मोठा एकत्रीकरणाच्या व्यवहार ठरणार असून,
दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित गंगाजळी ही एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल. या प्रस्तावित विलीनीकरणाला एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी, मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेस लि. या तिन्ही संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या स्वतंत्र बैठकांनी मंजुरी दिली असल्याचे उभयतांकडून स्पष्ट करण्यात आले. एचडीएफसी लाइफमध्ये एडिनबर्गस्थित स्टँडर्ड लाइफ पीएलसीचा ३५ टक्के भागभांडवल तर उर्वरित ६१.६३ टक्के वाटा हा एचडीएफसी लिमिटेड या भारतीय भागीदाराचा आहे. तर मॅक्स लाइफमध्ये जपानच्या मित्सुई सुमिटोमो इन्शुरन्स कंपनीचा २६ टक के भांडवली भागीदारी, तर मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेस या भारतीय भागीदाराकडे ६८ टक्के हिस्सा तर अॅक्सिस बँकेची ५.९९ टक्के भागीदारी आहे. हे प्रस्तावित विलीनीकरण उभय कंपन्यांकडून वाटाघाटीअंती तत्त्वत: मंजूर झाल्यास, त्याला भागधारकांची, नियामक यंत्रणा ‘आयआरडीए’ची मंजुरी, तसेच संबंधित उच्च न्यायालयांची मंजुरी मिळविणे क्रमप्राप्त ठरेल. भारतीय आयुर्विमा क्षेत्रात २४ खासगी कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसीच्या स्पर्धक बनून पुढे आल्या आहेत. तरी या काळात एलआयसीचे या क्षेत्रावर अधिराज्य कायम असून, बाजारहिस्सा आजही ७० टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. आणखी विलीनीकरण वाटेवर? भारतीय आयुर्विमा क्षेत्रात कार्यरत २३ खासगी कंपन्यांपैकी पहिल्या चार कंपन्यांचा बाजारहिस्सा हा ६५ टक्के असून, उर्वरित ३५ टक्के हिश्शासाठी १९ कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अविवा लाइफ, एक्साइड लाइफ आणि इंडिया फर्स्ट लाइफ या कंपन्या आठ-नऊ वर्षांच्या कारभारानंतरही स्पर्धेत लक्षणीय कामगिरी करू शकलेल्या नाहीत. प्रवर्तक म्हणून बँक अथवा वित्तीय संस्थांसारखा तगडा भागीदार नसणे ही या कंपन्यांच्या व्यवसाय विस्तारातील मोठी उणीव ठरत आली आहे. टाटा एआयजी आणि बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सबाबतही कमकुवत वितरण जाळे ही एक उल्लेखनीय उणीव आहे. सलगपणे तोटा नोंदविणाऱ्या या कंपन्यांना, या अत्यंत भांडवलप्रवण व्यवसायात तग धरून राहणे अशक्य दिसत आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांत ७.६ असा जगातील सर्वात वेगाने अर्थवृद्धी दर भारताने नोंदविला. लोकसंख्येचा ६६ टक्के हिस्सा ३५ वर्षांखाली असणे हे आयुर्विमा उद्योगासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आयुर्विमा उद्योगात अपेक्षित सुदृढीकरणातून, बडय़ा कंपन्या या विशाल व्यावसायिक ढाच्यातून ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि किफायती सेवा प्रदान करू शकतील जे एकंदर अर्थव्यवस्था व भारतीय जनतेच्या हिताचेच ठरेल.
No comments:
Post a Comment