प्रवाशांसाठी हवाई सफर अधिक स्वस्त करण्यासह या क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसायदृष्टय़ा प्रोत्साहनपर ठरेल अशा नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. देशांतर्गत विभागीय वाहतुकीला चालना देतानाच विदेश उड्डाणासाठी स्थानिक कंपन्यांना असलेल्या मर्यादा या धोरणामार्फत शिथिल करण्यात आल्या आहेत. यानुसार छोटय़ा शहरांदरम्यानच्या तासाभराच्या प्रवासासाठी
२,५०० रुपयांच्या भाडे मर्यादेसह प्रादेशिक जाळे निधीकरिता अतिरिक्त अधिभार लागू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर नेहमीच्या मार्गाव्यतिरिक्त असलेल्या अन्यसाठी कर सवलत देऊ करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवसायाकरिता पाच वर्षांच्या देशांतर्गत हवाई सेवेची अट रद्द करण्याबरोबर २० विमान ताफ्यांसह स्थानिक कंपन्यांना विदेशात विस्तार करता येईल. आंतरराष्ट्रीय उड्डाणाकरिता पाच वर्षांच्या स्थानिक अनुभवाची अट रद्द करण्याची मागणी टाटा समूहाचे रतन टाटा यांनी वेळोवेळी केली होती. त्यांची भागीदारी असलेल्या नव्या दमाच्या एअर एशिया व एअर विस्तारा या विमान कंपन्यांना नव्या धोरणाचा लाभ होईल. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक परवान्यासाठी ५ वर्षे अनुभव व २० विमाने या निकषावर क्षेत्रात काही मतभेद होते. ठरावीक भागातील हवाई सेवा विस्तारण्यासाठी घातलेल्या तिकीट निश्चिती मर्यादेमुळे कंपन्यांना होणारे नुकसान हे ८० टक्के परताव्याद्वारे भरून काढले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. २०२२ पर्यंत देशात प्रतिवर्षी ३० कोटी तर २०२७ पर्यंत प्रतिवर्षी ५० कोटी विमान प्रवास तिकीट विक्री होईल, असा अंदाजही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २०२७ पर्यंत २० कोटी तिकीट विक्रीचे अनुमान आहे. नव्या नागरी हवाई धोरणाच्या मंजुरीनंतर केंद्रीय नागरी हवाईमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले, की हवाई वाहतूक क्षेत्रात यामुळे बदल होतील व २०२२ पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकाचे मोठे क्षेत्र असेल. आठ महिन्यांच्या चर्चेनंतर हे धोरण ठरवण्यात आले असून, ऑक्टोबर २०१५ मध्ये त्याचा सुधारित मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर संबंधितांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने धोरणाचा कच्चा मसुदा २०१४ मध्ये जाहीर केला होता. आघाडी सरकारने राष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक धोरण मंजूर केले असून त्यामुळे अनेक बदल होतील, असे राजू यांनी ट्विट केले. भारतातील हवाई वाहतूक बाजारपेठेची लागोपाठ १३व्या महिन्यात वाढ झाली आहे. या महिन्यात ही बाजारपेठ २२ टक्के वाढली आहे. देशांतर्गत हवाई वाहतूक वाढ लागोपाठ विसाव्या महिन्यात दोन अंकी म्हणजे २१.८ टक्के झाली आहे. नव्या धोरणाची ठळक वैशिष्टय़े : – एक तासाच्या विमान प्रवासाला रु. २,५०० तिकीट भाडे मर्यादा – प्रादेशिक हवाई सेवा जोडणी निधीसाठी अतिरिक्त अधिभार लागणार – फारशी वर्दळ नसलेल्या मार्गावर सेवेत कंपन्यांना करसवलती – परदेशी हवाई सेवेसाठीचा ५ वर्षे स्थानिक कार्यानुभवाचा निकष रद्द
No comments:
Post a Comment