लोकदैवते, विविध भक्तीपंथ, धर्मस्थळे, संतसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला अशा विविध विषयांचा साक्षेपी धांडोळा लेखणीद्वारे घेत मराठी वाङ्मयाचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ऊर्फ रा. चिं. ढेरे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, लेखिका वर्षां गजेंद्रगडकर आणि प्रसिद्ध
छायाचित्रकार मििलद ढेरे यांचे ते वडील होत. गेल्या काही महिन्यांपासून ढेरे आजारीच होते. त्यामुळे त्यांच्या लेखन आणि संशोधन कार्यासाठीच्या प्रवासावर बंधने आली होती. बालाजी या दैवतावर सध्या संशोधन करण्याचा त्यांचा मानस होता. २१ जुलै रोजी डॉ. ढेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुटुंबीयांनी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या ग्रंथालयातील ४० हजारांहून अधिक पुस्तके वाचक, अभ्यासक आणि लेखकांसाठी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले होते. या कार्यक्रमाची आखणी सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे ढेरे यांची प्राणज्योत मालवली. ढेरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, श्याम मनोहर, डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, अभिनेते रवींद्र मंकणी, माजी आमदार उल्हास पवार, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, नगरसेवक सुभाष जगताप यांनी सहकारनगर येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. महाराष्ट्र साहित्य परिषद येथे सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, डॉ. न. म. जोशी, डॉ. सतीश देसाई, जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्यासह अनेकांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते. मंगळवारी श्रद्धांजली सभा ढेरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे परिषदेच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे. अण्णा ढेरे यांच्या जाण्यामुळे खूप काही गमावलं आहे. त्यांच्याबरोबर खूप काळ एकत्र वावरलो. अभ्यास केला. मुद्दय़ांवर भांडलो आणि हे मुद्दे संपल्यावर पुन्हा एकत्र झालो. आमचं काय नुकसान झालं ते शब्दांत सांगता येणार नाही. – बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीR
No comments:
Post a Comment