Wednesday 13 July 2016

अब्दुल सत्तार एढी


वाचा नसलेली गीता ही भारतीय मुलगी पाकिस्तानी रेंजर्सना सीमेलगत सापडल्यानंतर त्या देशात जेथे १३ वर्षे वाढली, जेथे तिच्यासाठी तिच्या खोलीत खास देव्हारा बसविण्यात आला, ते अनाथालय अब्दुल सत्तार एढी आणि त्यांच्या पत्नी बिल्किस एढी यांच्या न्यासाचे (ट्रस्टचे) होते. अब्दुल सत्तार आणि बिल्किस या दाम्पत्याने गीताला स्वत:ची मुलगीच मानले होते. अशा अनेक पोरक्या मुला-मुलींसाठी एढी दाम्पत्य गेली ६० वर्षे काम
करीत होते, त्यापैकी अब्दुल सत्तार एढी यांचे निधन गेल्या शुक्रवारी (८ जुलै) झाल्याने दक्षिण आशियाई देशांमधील एक महत्त्वाचे मानवतावादी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

महात्मा गांधी शांतता पुरस्कार (२००७), सोव्हिएतकालीन रशियाचा लेनिन शांतिपुरस्कार (१९८८), मॅगसेसे पुरस्कार (१९८६), युनेस्कोचा ‘मदनजीत सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ (२००९), पाकिस्तानचा ‘निशान-ए- इम्तियाज्म’ (१९८९), आदी अनेक पुरस्कारांची मोहोर अब्दुल सत्तार एढी यांच्या कामावर होतीच. पण आर्मेनियातील भूकंपापासून ते अगदी अमेरिकेतील कॅटरिना वादळाने झालेल्या संहारापर्यंत अनेक ठिकाणी पोहोचलेले ‘एढी फाऊंडेशन’चे स्वयंसेवक, ही एढी यांच्या प्रेरणेची खरी पताका होती. एवढे काम करताच आहात तर इस्लामसारख्या ‘उदात्त मूल्यां’साठी तरी करा, ही त्या धर्मातील सनातन्यांची अपेक्षा पार मोडीत काढत बिगरमुस्लिमांसाठीही एढी काम करत राहिले. चालू स्थितीतील दोन हजार रुग्णवाहिकांचे त्यांनी उभारलेले जाळे, हा सध्या तरी एखाद्या बिगरसरकारी संस्थेने केलेला जागतिक विक्रम आहे. पाकिस्तानात कराचीसह सर्वच शहरांत अतिरेक्यांचे हल्ले वाढले, तेव्हा जखमींना मदतीचा पहिला हात अनेकदा एढी फाऊंडेशननेच दिला होता.

अब्दुल सत्तार हे मूळचे जुनागढ संस्थानातले. जन्म १९२८ चा. ‘आई एक पैसा मला खाऊसाठी आणि एक पैसा भिकाऱ्यांना देण्यासाठी द्यायची,’ असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते. या संस्थानच्या नवाबाने भारतात येण्यास नकार दिला असूनही ‘लोकांच्या उठावा’मुळे जुनागढ विलीन झाले; त्या उठावाची आणि मातृछत्र हरपल्याची जखम मनात घेऊन एढी कराचीत आले. कापडाच्या फिरत्या विक्रेत्यापासून कमिशन एजंटापर्यंतचा व्यावसायिक प्रवास करतानाच व्यापारी मित्रांकडून वर्गण्या जमवून अन्नछत्रे घालू लागले. कराचीत १९५०च्या दशकातील फ्लू साथीत त्यांनी ‘एढी दवाखाना’ सुरू केला, तेव्हा साथ होती परिचारिका-पत्नी बिल्किस यांची. एढींची साधी राहणी हे लोकांच्या त्यांच्यावरल्या विश्वासामागचे सर्वात मोठे कारण; ती तशीच अखेपर्यंत राहिली.. इतकी की, न्यूयॉर्क आणि टोरांटोच्या विमानतळांवर त्यांची अडवणूक झाली होती. ‘राजकीय नेते, पक्ष किंवा धर्मस्थळे यांच्याकडून देणग्या नकोत. फक्त व्यक्तिगत देणग्याच स्वीकारू,’ हे तत्त्व एढींनी पाळले, हे त्यांच्याबद्दल तहहयात वाद नव्हतेच, याचे महत्त्वाचे कारण! ‘एढी रिक्षा सेवे’तून तरुणांना रोजगार देण्याचे कार्यही त्यांनी केले.  एढी घराण्यातील पुढील पिढय़ा न्यासाच्या कामात आता गढल्या आहेत.

No comments:

Post a Comment